Maharashtra

रिलायंस उद्योग समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट

By PCB Author

August 05, 2018

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – रिलायंस उद्योग समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हिल न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट काढण्यात आले आहे. या प्रकऱणी अनिल अंबानी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मधेपुरा जिल्ह्यातील बेहरी गावाचे रहिवासी सैनी साह यांचा १३ जुलै २०११ ला आसामच्या तिलोई गावात ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी रिलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनीकडून विमा घेतला होता. १६ ऑगस्ट २०११ रोजी सैनी यांची आई कौशल्या देवी यांनी मोबदल्यासाठी विमा कंपनीवर दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने सैनी यांच्या कुटुंबियांस २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ लाख ८३ हजार रुपये आणि त्यावर ९ टक्के वार्षिक व्याज देण्यास सांगितले. मात्र, तरीही मोबदला न मिळाल्याने कौशल्या देवी यांनी पुन्हा न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात कंपनीला दोनवेळेस नोटीस पाठवली. या नोटीशीला  कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.

त्यानंतर कंपनीचे चेअरमन अनिल अंबानी यांना अटक करण्याचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला, तसेच न्यायालयाकडे महाराष्ट्राच्या डीजीपी यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती केली. त्यानंतर अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे.