रिक्षा पंचायतचे रिक्षा बंद आंदोलन अविवेकी पणाचे, रिक्षा चालकांसाठी नुकसान दायक आहे – बाबा कांबळे

0
381

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – गुरुवारी (१ऑक्टोबर) रोजी रिक्षा पंचायत वतीने रिक्षा बंद करून संप पुकारला आहे. हा संप म्हणजे अविवेकी पणा असून यांचा दूरगामी परिणाम होईल, असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

प्रसिध्दीला दिलेल्या पत्रात कांबळे म्हणतात, देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून, एस टी महामंडळाने पूर्ण शमतेने एस टी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, लोकल सुरू व्हावी या साठी कायदेभंग आंदोलन केले जात आहे, मंदिर उघडण्यासाठी आंदोलन होत आहे, एकदरीत सर्व व्यवसाय खुले व्हावेत यासाठी आंदोलन होत असताना, अगोदरच ६ महिन्या पासून रिक्षा व्यवसाय बंद असून बंद असलेला रिक्षा व्यवसाय संप करून बंद करणे म्हणजे रिक्षा बंदची आपली मक्तेदारी अबाधित करण्याचा हा प्रकार आहे. रिक्षा पंचायतने अनेक वर्षे पुणे शहरातील रिक्षा चालकांचे नेतृत्व केले आहे अनेक वेळा बंद व संप केला आहे. योग्यवेळी योग्य भूमिका न घेतल्यामुळे आणि यापूर्वी आचार संहितेच्या काळात संपासारखे आंदोलन केल्यामुळे रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लागलेले नाही.
यामुळे पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालक रिक्षा पंचायत सोडून कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र रिक्षा पंचायत मध्ये सहभागी होत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात ९० टक्के रिक्षा स्टँड हे बाबा कांबळे यांच्या महाराष्ट्र पंचायतशी सलग्न आहेत. पुणे शहरात देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे सभासद होत आहेत. महाराष्ट्र रिक्षा पंचायत ने आज (३० ऑक्टोंबर) पुणे पिंपरी-चिंचवड शहरात आणि महाराष्ट्रात रिक्षा चालकांच्या प्रश्नावर बोंबा बोंब आंदोलन ठेवले आहे. या आंदोलनास रिक्षा चालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरात देखील प्रत्येक रिक्षा स्टँड वरती आंदोलनाची तयारी सुरू आहे. बाबा कांबळे यांच्या महाराष्ट्र रिक्षा पंचायतीस पुणे शहरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी देखील पाठिंबा दिला आहे. यामुळे गोंधळाच्या भरात रिक्षा पंचायत आणि त्यांच्या नेत्यांनी घाईघाईत अविवेकीपणाचा निर्णय घेतला आहे, असे कांबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाने रिक्षा चालकांसाठी टास्क फोर्स स्थापन केले आहे, यात रिक्षा पंचायत चे प्रतिनिधी म्हणून डॉ.बाबा आढाव यांना सदस्य म्हणून घेतले आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत रिक्षा पंचायत वतीने नितीन पवार यांनी प्रतिनिधित्व केले आहे. या ठिकाणी देखील रिक्षा पंचायत ने रिक्षा चालकांचे प्रश्न तडीस नेले नाहीत. नुकतीच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची रिक्षा पंचायत अध्यक्ष यांनी भेट घेतली. यावेळी हमालाच्या बरोबरीने रिक्षा चालकांचे प्रश्न मांडले असते तर त्यांना न्याय मिळाला असता, परंतु या बैठकीत रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर चर्चा सुद्धा केली गेली नाही. आता रिक्षा चालकांना पुढे करून शासनाच्या विरोधात असलेल्या रिक्षा चालकांचा रोश कमी केला जात आहे, अशी टीका ही बाबा कांबळे यांनी केली आहे.