राहुल गांधी भारताचे नागरिक आहेत का?: भाजपचा सवाल

0
479

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतले होते. याच कारणामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याकडे केली आहे. ब्रिटनमधील रजिस्ट्रेशन असलेल्या एका कंपनी कागदपत्रांच्या आधारे रवी प्रकाश यांनी हा दावा केला आहे. या बरोबरच राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही त्यांनी आरोप केले आहेत. या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) कांग्रेस पक्षाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

या प्रकरणी आपल्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने आपल्याला अवधी द्यावा असे राहुल गांधी यांचे वकील राहुल कौशिक यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याला सांगितल्याचे भाजपचे नेते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राहुल गांधी यांना सोमवार सकाळपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे, असे सांगत, राहुल यांच्या नागरिकत्वासंदर्भात नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांना उत्तरे दिली गेली नाहीत हे आश्चर्यकारक असल्याचे राव यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी राहुल यांना उत्तर द्यावेच लागेल. राहुल हे भारताचे नागरिक आहेत की नाहीत याबाबत निर्माण झालेला मुद्दा हा आश्चर्यचकित करणार आहे, असे राव म्हणाले. राहुल हे ब्रिटिश नागरिक होते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आपण बॅकऑफ्स लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती राहुल गांधींनी २००४ च्या निवडणूक शपथपत्रात दिली आहे. या कंपनीच्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचा उल्लेख आहे, असेही राव म्हणाले. राहुल ब्रिटनचे नागरिक होते का, हे कायद्याचे उल्लंघन आहे. जेव्हा एखादी भारतीय व्यक्ती दुसऱ्या देशाची नागरिक होते, तेव्ही तिचे भारतीय नागरिकत्व समाप्त होते असे राव यांनी म्हटले आहे. नागरिकत्व समाप्त झाल्यानंतर ती व्यक्ती भारतात निवडणूक लढवू शकत नाही, असेही ते पुढे म्हणाले.

राहुल गांधी सन १९८९ मध्ये १२वी उत्तीर्ण झाले आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून सन १९९५मध्ये एमफीलची पदवी संपादन केली. ही माहिती राहुल यांनी २००४ मध्ये दिली. मात्र, सन १९९४ मध्ये आपण रोलिन्स कॉलेज ऑफ फ्लोरिडामधून पदवी घेतली, तर १९९५मध्ये डिव्हेलपमेंट इकनॉमिक्समध्ये ट्रिनिटी कॉलेजमधून एमफीलची पदवी मिळवली असे राहुल यांनी सन २००९ मध्ये म्हटल्याचे राव म्हणाले. मात्र, सन २०१४ च्या निवडणुकीत आपण डिव्हेलपमेंट स्टडीजमध्ये एमफील केल्याचे राहुल म्हणाले, असे सांगत त्यांनी कोणती पदवी मिळवली हे त्यांना आठवत नाही का, असा सवाल राव यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.