Maharashtra

‘राहुल गांधींनी पप्पू नाही, तर पप्पा होण्याची गरज’- रामदास आठवले

By PCB Author

December 17, 2018

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आता पप्पा होण्याची गरज आहे असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. रामदास आठवले नेहमीच आपल्या अनोख्या शैलीतील वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. यावेळी त्यांनी राहुल गांधींना सल्ला देताना आता ते पप्पू राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी आता पप्पा होण्याची गरज आहे असे वक्तव्य केले आहे.

कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले. रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्ला दिला. पुढे ते म्हणाले की, ‘राहुल गांधी हे आता पप्पू राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी पप्पा होण्याची गरज आहे’. ‘सर्वजण राहुल गांधींना पप्पू म्हणत होते, पण माझा त्यांना सल्ला आहे की तुम्ही पप्पू नाही पप्पा झाले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला लवकर लग्न करणे गरजेचे आहे. तुम्हाला तीन राज्यात यश मिळाले आहे. राहुल गांधींनी लवकर लग्न करावे आणि पप्पा होऊन नाव कमावावे’, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांना कोस्टल रोडवरुन शिवसेना आणि भाजपात सुरु असलेल्या राजकारणावर प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी दोन्ही पक्षांना चिमटा काढत भूमिपूजन कोणीही केले तरी ही प्रकल्प लोकांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाने समजूतदारपणे वागले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

तसेच शिवसेकडून सतत होणाऱ्या टीकेमुळे भाजपोसबत युती होईल का असे विचारण्यात आले असता या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल जलन आहे, पण तरीही मनोमिलन गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.