पंढरपूर, दि. ९ (पीसीबी) – एखाद्या लाटेत निवडून आलेले सरकार फार काळ राहत नाही, असा इतिहास सांगतो. त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या भाजप शिवसेनेचे आमदार- खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाही. तर येत्या १२ डिसेंबरनंतर राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुरु होईल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
पंढरपुरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी मुंडे आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंडे म्हणाले की, खोटी आश्वासने देऊन देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर आली आहे. ५ वर्षात फक्त सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. लाटेत निवडून आलेल्या सरकारमधील आमदार आणि खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाहीत. त्यामुळे येत्या १२ डिसेंबर नंतर राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुरु झालेली दिसून येईल, असे मुंडे म्हणाले.