राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मीरी लोकांचा आवाज दाबला जात आहे – प्रियंका गांधी  

0
411

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मीरच्या लोकांचा  आवाज दाबत आहात. यापेक्षा जास्त राजकीय आणि राष्ट्रविरोधी काही नसू शकते.  तुम्ही स्वतः जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहात आणि आरोप मात्र विरोधकांवर लावत आहात,  असा हल्लाबोल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर  कलम ३७० हटण्याच्या मुद्यावरून  केला  आहे.

याबाबत प्रियंका गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये  म्हटले आहे की, काश्मीरमध्ये राष्ट्रवादाच्या नावाखाली लाखो लोकांचा आवाज दाबला जात आहे.  काश्मीरमधील सर्व लोकशाही हक्कांवर गदा आणली जात आहे. या विरोधात आवाज उठवणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि आम्ही हे करण्यापासून थांबणार नाही.

दरम्यान, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या १२ नेत्यांना शनिवारी श्रीनगर विमानतळावरूनच परत पाठवण्यात आले होते. राहुल गांधी कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा व तेथील स्थानिकांची भेट घेऊ इच्छित होते. मात्र त्यांना अडवण्यात आल्यानंतर प्रियंका गांधींनी ट्विटद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.