राष्ट्रपतींच्या हस्ते विराट कोहली, मीराबाई चानू यांना खेलरत्न पुरस्कार

0
542

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना आज ( मंगळवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. विराट कोहली खेलरत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी १९९७ साली सचिन तेंडुलकर आणि २००७ साली महेंद्रसिंह धोनीला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. 

क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार दिला जातो. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्टरोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. मात्र, यंदा आशियाई स्पर्धेमुळे या सोहळ्याची तारीख लांबणीवर टाकण्यात आली होती.

दरम्यान, मीराबाई चानूने ट्विटरवरुन खेलरत्न पुरस्कार मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कर्णम मल्लेश्वरी आणि कुंजराणी यांच्यानंतर खेलरत्न पुरस्कार मिळवणारी मीराबाई चानू ही तिसरी महिला वेटलिफ्टर ठरली आहे. याव्यतिरीक्त विविध क्रीडा प्रकारातील २० खेळाडूंचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.