रावसाहेब दानवे यांच्यामुळेच नामचीन गुंडांना भाजपमध्ये प्रवेश; आमदार अनिल गोटेंचा आरोप

0
976

धुळे, दि. १४ (पीसीबी) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामुळेच  नामचीन गुंडांना पक्षात प्रवेश मिऴत आहे. तर मते वाढवण्यासाठी गुंडांना प्रवेश दिल्याचे  सांगितले जाते. भाजपचे केवळ सत्तेसाठी होत असलेले अध:पतन मन अस्वस्थ करणारे आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती. आज ते हयात असते, तर तुम्ही असे धाडस केले असते का? असा  सवाल आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

गोटे यांनी भाजपच्या सर्व आमदारांना लिहिलेल्या पत्रात आपली भूमिका मांडली आहे. या पत्रात त्यांनी प्रदेशाध्यक्षांसह पक्षनेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. तर दुसरीकडे  विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे गोटे यांनी मंगळवारी जाहीर केले आहे. त्यामुळे  महापालिका निवडणुकीच्या  तोंडावर  भाजपची डोकेदुखी  वाढण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या निवडणुकीत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या आग्रहास्तव आपण भाजपकडून उमेदवारी केली. त्या वेळी भाजपच्या बहुतांश स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष देवरे यांचे काम  संरक्षण राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून केले आहे,  असाही आरोपही गोटे यांनी पत्रात केला आहे. डॉ. सुभाष भामरेंनी अडीच वर्षांपासून पक्षाच्या फलकांवर माझा फोटो लावणे बंद केले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.