Maharashtra

रावसाहेब दानवे यांची पुन्हा जीभ घसरली; शहीद जवानांऐवजी अतिरेकी म्हणाले

By PCB Author

March 26, 2019

सोलापूर, दि. २६ (पीसीबी) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. सोलापूरात युतीचा प्रचार करत असताना पुलवावा हल्ल्यातील शहीद भारतीय जवानांना जवान संबोधण्याऐवजी दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४० अतिरेकी मारले असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोलापूरात महायुतीच्या मेळाव्यात बोलताना दानवे म्हणाले, “देशात युद्धजन्य स्थिती आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कधी युद्ध होईल हे सांगता येत नाही. पाकिस्ताने भारतावर हल्ला केला. पाकिस्तानने भारताचे ४० अतिरेकी मारले.”

दानवे यांनी भारतीय सैनिक म्हणण्याऐवजी ते अतिरेकी म्हणाले. त्यामुळे मेळाव्यात एकच खळबळ उडाली. दानवे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या वेळी सुभाष देशमुख, नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी असे म्हटले नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.