रावसाहेब दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर

0
911

जालना, दि. १७ (पीसीबी) – आपले कोण, परके कोण, हे समजायला दानवे तयार नाहीत. आम्ही इतकी वर्षे त्यांच्यासाठी मदतच करत  आलो आहोत.  इतके करुनही त्यांना कळत नसेल, तर निश्चितपणे ही निवडणूक आणि निवडणुकीचे वातावरण त्यांना कळून चुकलेले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरलेली दिसते. त्यामुळे ते काहीपण बरळायला लागले आहेत, अशी टीका राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री  अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर केली.

जालना जिल्ह्यातील अंवड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभात रावसाहेब दानवे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार याच्यावर टीका केली होती. त्या टीकेला  अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी दानवे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकसंधी ते सोडत नाहीत. त्यामुळे आगामी काळात या दोघांमधील कलगीतुरा अधिकच रंगण्याची शक्यता आहे.