Maharashtra

राम कदमांनी माफी मागितल्याने हा विषय संपला आहे-चंद्रकांत पाटील

By PCB Author

September 07, 2018

कोल्हापूर, दि. ७ (पीसीबी) – भाजप आमदार राम कदम यांनी माफी मागितल्याने हा विषय संपला आहे, असे स्पष्ट करून भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राम कदम हे महिलांबद्दल असे विधान करतात, असा इतिहास नाही. याउलट त्यांच्या मतदारसंघातील महिला त्यांना राखी बांधतात, असेही पाटील यांनी सांगितले.  

दरम्यान, राम कदम यांनी मुलीविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. विरोधकासह महिला संघटनांनी राम कदम यांचा निषेध केला होता. या विधानानंतर कदम वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. अखेर गुरुवारी  राम कदम यांनी ट्विटरवरुन महिलांची माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला. त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असे कदम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.