Maharashtra

रामदास कदम मातोश्रीचे पगारी नेते–निलेश राणे

By PCB Author

January 10, 2019

कोल्हापूर, दि. १० (पीसीबी) – शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मराठा आरक्षणासाठी काहीही काम केले नाही. ते मातोश्रीचे पगारी नेते आहेत. टपोरी लोक काय म्हणतात, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही, असे टीकास्त्र स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी सोडले.  

खासदार संभाजीराजे यांनी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मराठा आरक्षणाबाबत कौतुक केल्याने कदम यांच्या पोटात का दुखते, असा सवाल राणे यांनी यावेळी  उपस्थित केला. तोतरे बोल काढून दाखवत कदम यांची निलेश यांनी खिल्ली उडवत आधी त्यांनी नीट बोलायला शिकावे, असा सल्ला  त्यांनी दिला.

दरम्यान, सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती घराण्यातील खासदार संभाजीराजे यांच्याबाबत रामदास कदम यांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यात आला. मंत्री कदम यांनी केलेल्या विधानाबाबत त्यांनी संभाजीराजे यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.