राफेल करार प्रकरण; यूपीए सरकारनेच रिलायन्सशी बोलणी केल्याचे पुरावे – भाजपा

600

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – राफेल करारावरून टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना चोर म्हटले. तसेच फ्रान्सने दिलेल्या अधिकृत स्पष्टीकरणाचाही संदर्भ त्याला जोडला आणि ओलांद यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटले आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला. देशाच्या पंतप्रधानाबाबत एकाही पक्षाच्या अध्यक्षाने कधीही अशाप्रकारे शब्द वापरून इतक्या खालच्या पातळीची टीका केलेली नाही. राहुल गांधी यांनी यावेळी मर्यादा सोडली असे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. काँग्रेस घराणे हे भ्रष्टचाराचे माहेरघर आहे असा आरोप आता भाजपाने केला आहे. तसेच राहुल गांधी यांचे आरोपही भाजपा प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी खोडून काढले आहेत.

राहुल गांधी म्हणतात रिलायन्सचा फायदा व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारात फेरफार केले मात्र रिलायन्सचं नाव यूपीएच्या काळापासून चर्चेत होते याचे आमच्याकडे पुरावे आहेत. यूपीएनने केलेल्या करारापेक्षा आत्ता असलेली विमानांची किंमत २० टक्के कमी आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच अंबानी यांना करारात सहभागी करून घेण्याची प्रक्रिया फ्रान्स सरकारचीच आहे असेही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. राफेल करारावरून राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर आता भाजपाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.