मुंबई, दि. १४ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आजपासून (बुधवार) सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला आहे. शर्मिला ठाकरे यांनी सकाळी पुराचा तडाखा बसलेल्या सांगलीतील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट देऊन दौऱ्याची सुरुवात केली.
शर्मिला ठाकरे यांनी दुपारी सांगलीतील पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन नुकसानाची पाहणी केली. तसेच मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर मिरज शहरातील कृष्णा घाट परिसरातील पूरग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या,
सांगली दौऱ्यानंतर शर्मिला ठाकरे कोल्हापूरला रवाना होणार आहेत. महापुराचा जबरदस्त तडाखा बसलेल्या शिरोळ, टाकवडे, इचलकरंजीतील पूरग्रस्तांची भेट संध्याकाळी घेणार आहेत. त्यानंतर साताऱ्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करुन त्या मदतकार्य करणार आहेत. दरम्यान, मनसेच्या अनेक शाखांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे .