Maharashtra

राज्य सरकारने निर्णय बदलला; पुरग्रस्तांना रोखीने मदत देणार

By PCB Author

August 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राज्यातील पूरग्रस्तांसाठी १५४ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. हे पैसे  संबंधितांच्या बँक बचत खात्यात जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र, या आदेशावर सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर सरकारने हा आदेश मागे घेतला आहे. 

पूरग्रस्तांना शक्य तिथे रोखीनेच मदत देण्यात येईल. काही ठिकाणी पैसे बँकेत जमा केले जातील. मात्र, तो निर्णय सर्वस्वी जिल्हाधिकाऱ्यांचा असेल. परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काँग्रेसने सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती.  आपत्तीच्या काळात आजवर रोखीने मदत देण्यात आली. मात्र, या सरकारने बँक खात्यामार्फत मदत देण्याचे ठरवले आहे. लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना त्यांना बँकेच्या चकरा मारायला लावणे चुकीचे आहे,  असे काँग्रेसने म्हटले होते. तसेच, सोशल मीडियावरूनही सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठविण्यात येत होती.