मुंबई, दि. ११ (पीसीबी) – बहुप्रतिक्षित राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त काढण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, रणजितसिंह मोहिते पाटील आणि कालिदास कोळंबकर हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. तर नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
नव्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सहा जणांचा शपथविधी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर शिवसेनेची एकाच वाढीव मंत्रिपदावर बोळवण होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे ६ आणि शिवसेनेचा १ मंत्री शपथ घेणार आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
औरंगाबादचे भाजप आमदार अतुल सावे किंवा प्रशांत बंब यांनाही मंत्रिपद मिळू शकते. तर बुलडाण्यातील जळगाव-जामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागेल, असे बोलले जात आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागरांना शिवसेनेच्या कोट्यातून आरोग्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.