मुंबई, दि. १५ (पीसीबी) –राज्यातील भीषण दुष्काळावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून लक्ष घालावे आणि संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
या पत्रात पवार यांनी म्हटले आहे की, सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्याकडे समस्या मांडल्या. यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळही पवार यांनी मागितली आहे.
पवारांनी चारा छावण्यांतील शेतकऱ्यांच्या, मालकांच्या अडचणीही समजून घेतल्या. शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी यावर कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबाबतचे सविस्तर म्हणणे पत्रात मांडले आहे. तसेच या समस्यांवर चर्चा करण्यासाठी पवार यांनी दुष्काळी भागातील काही प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्याच्या भेटीची वेळही मागितली आहे.