मुबई, दि.७ (पीसीबी) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अयोध्या नगरीच्या मनामनांत आहेत याचा अनुभव आम्ही अनेकदा घेतला आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे अयोध्येत जात आहेत ते त्याच एका श्रद्धेने . हातात सत्ता नव्हती तेव्हाही ते रामचरणी गेले . आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावरही ते अयोध्येत जात आहेत ते त्याच नम्र भावाने . महाराष्ट्रातील शेतकरी , कष्टकरी , महिला , आबालवृद्ध हे सुखाने नांदावेत , राज्यात एकात्मता आणि बंधुभाव नांदावा अशी प्रार्थना‘ ठाकरे सरकार ’ रामचरणी करतील. हे राज्य श्रींचे आहे . म्हणजे छत्रपती शिवरायांचे आहे. ते छत्रपतींच्या न्यायबुद्धीने, तितकेच श्रीरामांच्या सत्य मार्गाने चालेल. जनतेला दिलेल्या वचनांना जागणारी कर्तव्यबुद्धी सरकारच्या विचारात असणे हेच रामराज्य ठरते. हेच राज्य महात्मा गांधींना हवे होते. महाराष्ट्रात त्याच विचारांचे राज्य चालले आहे. ते तसेच चालत राहील. पाठीशी श्रीराम आहेतच ! असे या अग्रलेखात म्हटले आहे.