राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के

0
235

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : अखेर महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता.

या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोककण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएसची व्होकेशनल या शाखांमधील एकूण 14, 20, 575 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14, 13, 687 विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले. त्यापैकी 12, 81, 712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 90.66 टक्के आहे.

या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधील एकूण 86, 739 विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 86, 341 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील 33, 703 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 39.03 टक्के आहे. सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 95.89 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 93.88 टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल 88.04 टक्के आहे. म्हणजेच विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 5.84 टक्क्यांनी जास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.57 टक्के लागला आहे. एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

यंदा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे निकाल जाहीर होण्यास बराच उशिर झाला. मागच्या वर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकालाला बराच विलंब झाला.

विभागनिहाय निकाल
कोकण – 95.89
पुणे – 92.50
कोल्हापूर -92.42
अमरावती – 92.09
नागपूर – 91.65
लातूर – 89.79
मुंबई – 89.35
नाशिक – 88.87
औरंगाबाद – 88.18