राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांमधून ‘नोटा’ चा पर्याय रद्द – निवडणूक आयोग

0
580

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) –  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमधून ‘नोटा’   हा पर्याय रद्द केला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी ‘नोटा’चा पर्याय काढून टाकला पाहिजे, असे स्पष्ट मत सर्वोंच्च न्यायालयाने नोंदवले होते.   

याबाबत काँग्रेस नेते शैलेश मनुभाई परमार यांनी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानुसार, निवडणूक आयोगाने राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमधून ‘नोटा’चा पर्याय काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘नोटा’चा पर्याय कायम राहणार आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद या निवडणुकांच्या मतपत्रिकेत ‘नोटा’चा पर्याय छापला जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

सर्वसामान्य नागरिक मतदान प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हाच ‘नोटा’चा वापर केला जाऊ शकतो. राज्यसभेची मतदान प्रक्रिया आधीच गुंतागुंतीची असते. ‘नोटा’चा वापर केल्यास अधिक गुंता  वाढेल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले होते.