Desh

राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अकाली दल तटस्थ ?  

By PCB Author

August 07, 2018

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी (दि. ९) निवडणूक होणार असून   या पदासाठी एनडीएकडून जेडीयूचे खासदार हरीवंश यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे पंजाबमधील मोठा पक्ष आणि एनडीएचा मित्र पक्ष अकाली दलाने नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अकाली दल मतदानापासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हरीवंश यांच्या नावावर सहमती मिळवण्यासाठी अकाली दलचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्याशी चर्चा केली. राज्यसभेत अकाली दलचे तीन खासदार आहेत. मात्र पक्षीय बलाबल पाहता विरोधक आणि एनडीएसाठी एक मत फार महत्त्वपूर्ण आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही अविश्वास ठरावाच्या वेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे अकाली दल आणि शिवसेनेने एनडीएच्या बाजूने मत न दिल्यास ही निवडणूक जिंकणे एनडीएसाठी अवघड आहे. वरिष्ठ सभागृहात एकाही पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. एनडीएकडे अधिक मते असली तरी बहुमत नाही. बीजेडी, एआयडीएमके, तेलंगणा राष्ट्र समिती यांचीही   भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.