राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता; मराठवाडा- विदर्भामध्ये मुसळधार

0
1160

मुंबई, दि. २७ (पीसीबी) –  आजपासून राज्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा-विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु सध्या मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाला मिळाले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व-विदर्भात २७ आणि २८ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते, ज्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.