राजू शेट्टी म्हणजे ऊसाला लागलेला कोल्हा – सदाभाऊ खोत  

0
704

सांगली, दि. १२ (पीसीबी) – खासदार  राजू शेट्टी  आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्यातील संघर्षाची प्रचिती येत आहे. शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा आहे.  या कोल्ह्याला हाकलून लावायचे आहे. हा कोल्हा कारखानादाराच्या मांडीला मांडी लावून नव्हे, तर मांडीवर जाऊन बसला आहे, असा जोरदार हल्लाबोल  खोत यांनी चढवला.

या कोल्ह्याचा बंदोबस्त या निवडणुकीत आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. म्हणून शिवसेनेचे उमेदवार  धैर्यशील माने यांना निवडून द्या, असे आवाहन खोत यांनी यावेळी केले. इस्लामपूर येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. यावेळी खोत यांनी शेट्टीवर तोफ डागली.

यासभेला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम उपस्थित होते. खोत यांनी प्रचारात शेट्टी यांना लक्ष्य केले आहे. खोत यांच्या टीकेला शेट्टी काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.