राजू शेट्टी महान नेते, त्यांच्याबद्दल न बोललेले बरे – सदाभाऊ खोत

0
866

मुंबई, दि. १६ (पीसीबी) –  स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी हे महान नेते आहेत. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी देशात अद्याप माणूसच जन्माला आलेला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेले बरे’, अशी उपरोधिक टिप्पणी राज्याचे  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या विरोधात लढावे’ असे आव्हान खासदार शेट्टी यांनी दिले आहे. त्यावर बोलताना सदाभाऊ म्हणाले की, राजू शेट्टी महान माणूस आहे. त्यांनी थेट देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या विरोधात लढण्याचे आव्हान दिले होते. त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार?

शेट्टींच्या विरोधात लढण्यासाठी देशामध्ये माणूस जन्माला आलेला नाही?  शेट्टींनी अशी प्रत्येकाला आव्हाने देण्यापेक्षा स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या एखाद्या  मतदारसंघातून निवडणूक लढवावी. त्यानंतर   त्यांना त्यांच्या ताकदीचा अंदाज येईल, असा टोलाही खोत यांनी लगावला.