Maharashtra

राजू शेट्टींचे प्रसिद्धीसाठी आंदोलन ; सदाभाऊ खोतांची टीका   

By PCB Author

November 15, 2018

 सातारा, दि. १५ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  रयत क्रांतीच्या ऊस परिषदेत ऊस दराबाबत सकारात्मक निर्णय जाहीर केला होता. मात्र, केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलन सुरू केले आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी स्वाभीमानी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांचे नांव न घेता केली.   

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणूक माढा की हातकणंगले मतदारसंघातून लढणार?, या प्रश्नावर खोत यांनी आता मैदानातच लढत देणार, असे सांगून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून  राजू शेट्टी यांच्याविरोधात  दंड थोपटणार असल्याचे संकेत दिले.

मुख्यमंत्र्यांनी  ऊस परिषदेच्या व्यासपीठावर ऊसाचा दर जाहीर केला. साखर कारखान्यांकडून तो मिळाला नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना केवळ प्रसिध्दीसाठी आंदोलन करत असल्याची टीका खोत यांनी केली.