जयपूर, दि. ११ (पीसीबी) – दर पाच वर्षांनी राजस्थानमध्ये सत्ता बदल होण्याचा ट्रेंड कायम राहिला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी झाल्या आहेत. मात्र, त्यांना आपल्या नेतृत्वाखाली सत्ता कायम राखण्यात अपयश आले आहे. काँग्रेसची राजस्थानात सत्तेकडे आगेकूच सुरू आहे.
गेल्या वीस वर्षांत कोणत्याच पक्षाला राजस्थानमध्ये सलग दोन टर्म सत्ता कायम राखता आलेली नाही. काँग्रेस आणि भाजप यांची राजस्थानात आलटून पालटून सत्ता येत असते. ही परंपरा मोडून काढण्याची संधी वसुंधरा राजे यांनी गमावली आहे. राजस्थानच्या मतदारांनी वसुंधरा राजे यांच्यावरील नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसने वसुंधरा राजेंच्या विरोधात भाजप नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांना रिंगणात उतरवले होते, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, २००३ आणि २०१३ मध्ये वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. मात्र, यावेळी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गडाला काँग्रेसने खिंडार पाडले आहे.