नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – आपण जर राजकारणात प्रवेश करायचा निर्णय घेतला, तर बायको सोडून देईल. माझ्या कौटुंबिक आयुष्यात समस्या निर्माण होतील, असे सांगून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी राजकारणात प्रवेश करण्याची अजिबात इच्छा नाही, असे स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे सरकार आले, तर रघुराम राजन यांना अर्थमंत्री केले जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे. मात्र रघुराम राजन यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आपण जिथे आहोत तिथे प्रचंड आनंदी आहोत. राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
राजकारणात आलो, तर माझी पत्नी मला सोडून देईल आणि माझ्यासोबत राहणारही नाही, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. यासोबतच राजकारण सगळीकडून सारखेच आहे. मी जिथे आहे तिथे खूप आनंदी आहे. पण माझ्यासाठी एखादी संधी असेल, तर मला तिथे उपस्थित राहणे आवडेल, असे राजन यांनी म्हटले आहे.