रथयात्रा रोखल्यास रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू; भाजप महिला नेत्याचे वादग्रस्त विधान

949

कोलकाता, दि. ११ (पीसीबी) – जे लोक पश्चिम बंगालमधील नियोजित रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू, अशी धमकी राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी दिली आहे. ही रथयात्रा राज्यात लोकशाही स्थापन करण्याच्या उद्देशाने आयोजित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मालदा जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

चॅटर्जी पुढे म्हणाल्या की, रथ यात्रेचा मुख्य उद्देश हा पश्चिम बंगालमध्ये लोकशाही बहाल करणे. आम्ही यापूर्वीही म्हटले आहे की, रथ यात्रा रोखणाऱ्यांचे शिर रथाच्या चाकाखाली चिरडून काढू.  दरम्यान या वक्तव्याचा सत्तारुढ तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी निषेध केला आहे. भाजप नेते प्रक्षोभक वक्तव्ये करत राज्यातील शांतता आणि स्थिरता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत,  असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा तीन रथयात्रांची सुरुवात करणार आहेत. राज्यातील सर्व ४२ लोकसभा मतदारसंघात जाणारी ही रथयात्रा ५, ७ आणि ९ डिसेंबरला निघेल. यात्रेच्या समाप्तीनंतर पक्षाची कोलकाता येथे एक सभा होणार आहे. त्यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी  उपस्थित राहण्याची शक्यता आहे.