मुंबई, दि. १० (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण आणि मुख्यमंत्री युतीबाबत निर्णय घेणार आहे. याबाबत एक दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांसमोर युतीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, युतीबाबत इतर लोकांना काय बोलायचे आहे, त्यांनी बोलावे. पण युतीबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत आपण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळून घेणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आदित्य यांचा एक दिवस राहुल गांधी होईल, अशी टीका केली होती. यावर उत्तर देताना ‘बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेनेवर बोलण्यापेक्षा ओवेसी वर बोलावे’ असा टोला लगावला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याबाबत कोणी वेडे वाकडे करेल असे वाटत नाही, म्हणून मी आता पर्यंत काही बोललो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील घुसखोर बंगलादेशी आहेत त्यांना देशाच्या बाहेर काढायलाच हवे, कोणी त्यांना मांडीवर बसविण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांनी बसवावे, अशी टीकाही त्यांनी केली.