नागपूर, दि. २४ (पीसीबी) – भाजप आणि शिवसेनेची युती होण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी वैद्य बोलत होते. जानेवारी महिन्यापर्यंत सरकार राम मंदिरासंबंधी अध्यादेश काढेल, असे वाटत नसल्याचे वैद्य यांनी यावेळी म्हटले आहे.
आपल्याला ठाऊक आहेच की राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत उद्धव ठाकरे यांनी अयोध्या गाठली आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस ते अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. शिवसेनेने निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे, असेही वैद्य यावेळी म्हणाले.
दरम्यान, भाजपने अनेकदा राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी मात्र, शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येला जाण्याचीच घोषणा ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली होती. राम मंदिरासंबंधीचा अध्यादेश सरकार काढणार असेल तर आम्ही पाठिंबा देऊ ,असे उद्धव ठाकरेंनी अयोध्येत पोहचल्यावर जाहीर केले आहे.