युती सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर; कृषी व सिंचन योजनांसाठी भरीव तरतूद

0
598

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –  भाजप-शिवसेना युती सरकारचा  अखेर अर्थसंकल्प विधीमंडळात आज (मंगळवार)  सादर करण्यात आला.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात कृषी, रोजगार, पायाभूत अर्थव्यवस्था, उद्योग अशा सर्व क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रीलियन डॉलर म्हणजे  ७० लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले. यासाठी महाराष्ट्र आर्थिक‍ विकास परिषदेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

११ हजार ३३२ कोटी ८२ लक्ष‍ किमतीच्या वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ८ हजार ८१९ किमी लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित २० हजार २५७ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याच्या प्रकल्पावर  ६ हजार ६९५ कोटी इतका खर्च अपेक्षित असून काम प्रगतीपथावर आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेवर आतापर्यंत ८९४६ कोटींचा खर्च केला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षासाठी जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तर कृषी सिंचन योजनांसाठी २ हजार ७२० कोटींची तरतूद  करण्यात आली आहे. चार कृषी विद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद तर काजू उत्पादन प्रक्रियेला चालना देण्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जलसंपदा विभागासाठी १२ हजार ५९७ कोटी १३ लक्ष ८९ हजारांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून ४ हजार ५६३ कोटी रुपये मिळाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या  आहेत. त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. कृषी सिंचन योजनांसाठी २ हजार ७२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी, यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या तरतुदी –

> छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ५०.२७ लाख खातेदारांसाठी २४ हजार १०२ कोटी मंजूर

> सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी ७७५ कोटी रुपयांची तरतूद

> ८० टक्के दिव्यांग असणाऱ्यांना सरकार घर बांधून देणार

> ओबीसी समाजासाठी राज्यात ३६ वसतीगृह सुरू करणार

> राज्यात ८० तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेतंर्गत फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय

> नागपूर जिल्हयातील कोराडी येथे १३२० मेगावॅट क्षमतेच्या नव्या औष्णिक विद्युत प्रकल्पाला मान्यता