Maharashtra

युती तोडल्याचा उद्धव ठाकरेंना पश्चाताप होईल – सुभाष देशमुख

By PCB Author

January 19, 2020

उस्मानाबाद,दि.१९(पीसीबी) – महाराष्ट्राची जनता आगामी काळात शिवसेनेला चांगलाच झटका देईल. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भविष्यात युती तोडल्याचा पश्चाताप करावा लागेल, असं भाकित माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. ते भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभा निवडणुकीत युतीच्या बाजूनं कौल दिला होता. मात्र, निकालानंतर शिवसेनेनं वेगळा होण्याचा निर्णय घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केलं. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

गेल्या पाच वर्षात भाजपने जनहिताची अनेक कामे केली. तसेच राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले. त्यामुळे जनतेने भाजप-सेनेच्या युतीला बहुमत दिले. मात्र, शिवसेनेनं विश्वासघात करत महाविकास आघाडीशी सलगी केली, अशी टीका त्यांनी केली आहे.