युती झाल्यास शिवसेनेला मावळ मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार; मुख्यमंत्र्यांची प्राधिकरणात सभा आयोजित करून भाजपचा सेनेला सूचक इशारा!

0
599

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण आता खऱ्या अर्थाने तापू लागले आहे. भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, असा संभ्रम असताना शिवसेनेचे खासदार असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपने शड्डू ठोकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. विशेषतः मावळ मतदारसंघात भाजपचे कमळ शंभर टक्के फुलणार असल्याची पक्षाला खात्री आहे. युती झाल्यास मावळ मतदारसंघ कोणत्याही स्थितीत मिळवण्याचा भाजपने चंग बांधला आहे. मावळ मतदारसंघात येणाऱ्या निगडी प्राधिकरणात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३ नोव्हेंबर रोजी सभेचे आयोजन करून भाजपने शिवसेनेला सूचक इशाराच दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे युती झालीच, तर शिवसेनेला मावळ मतदारसंघावर पाणी सोडावे लागण्याची राजकीय चिन्हे दिसत आहेत.