मुंबई, दि. १४ (पीसीबी) – आगामी लोकसभेसाठी भाजपला शिवसेनेशी जर युती करायची असेल, तर राज्यात आमचा मुख्यमंत्री असायला हवा, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. एका वृतसंस्थेशी बोलताना राऊत यांनी भाजपसमोर युतीसाठी मुख्यमंत्रीपदाची अट ठेवली आहे.
त्याचबरोबर येत्या ४८ तासांत जर युतीवर निर्णय झाला नाही तर आम्ही आमच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात करु, असा अल्टिमेटमही त्यांनी भाजपला यावेळी दिला. त्यामुळे या प्रस्तावावर आता भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राऊत म्हणाले की, जर २०१९ मध्ये एनडीएचे सरकार आल्यानंतर त्यामध्ये शिवसेना, अकाली दल आणि इतर महत्वाच्या मित्र पक्षांची महत्वाची भुमिका असेल. एनडीएतील हे सर्व मित्रपक्ष त्यांच्या राज्यांमध्ये मजबूत स्थितीत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला केंद्रात युती हवी असेल, तर त्या मित्र पक्षांचा मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात असायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले.