‘या’ कारणांमुळे त्यांनी केला तरुणावर जीवघेणा हल्ला

0
281

बावधन, दि. २६ (पीसीबी) – भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका तरुणावर खूनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजता च्या सुमारास बावधन बुद्रुक येथे घडली.

जितेश शांताराम रास्ते (वय 31, रा. पिंगारा, हॉटेलच्या पाठीमागे, बावधन बुद्रुक) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत रविवारी (दि. 25) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज भैरू राजावत (वय 61), उमेश मनोज राजावत (वय 25), तुषार बिनावत (वय 22), दोन महिला (सर्व रा. पिंगारा हॉटेलच्या पाठीमागे, बावधन बुद्रुक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मनोज राजावत याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश याचा मित्र देवीच्या मंदिराजवळ लघुशंका करत होता. त्या कारणावरून फिर्यादी यांचा मोठा भाऊ संजय याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. फिर्यादी यांनी मध्यस्थी करून तो वाद सोडला.

मध्यस्थी करून फिर्यादी यांनी वाद सोडवल्याचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या आई-वडिलांसह घरी जेवण करत होते. त्यावेळी आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. आरोपी उमेश याने कोयत्याने तर इतर आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत