…यासाठी शिवसेनेने जागावाटपात तडजोड केली – उद्धव ठाकरे

0
472

मुंबई, दि. ७ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीचे जागावाटप करताना  शिवसेनेने महाराष्ट्राच्या हितासाठी तडजोड केली, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. शिवसेनेने जागावाटपात तडजोड केली असली, तरी आम्हाला सत्तेत मात्र समान वाटा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. मी युतीसाठी तडजोड केली. पण ही तडजोड महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. मी महाराष्ट्राच्या हिताचा शब्द दिल्यानंतर तुझं माझं करून खेचाखेची करणे मला पटत नाही. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाच्यावेळी आमची अडचण समजून घ्या, अशी विनंती केली होती. ती अडचण मी समजून घेतली. एकाकी लढायचेच झाले तर शिवसेना ते कधीही करू शकते, असे उद्धव यांनी सांगितले.

समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे, यावर गर्जना करायची किंवा नाही, हे ठरते. अन्याय असेल तिथे शिवसेना गर्जना करणारच. वादळ असताना शांत राहायचे असते, असे बाळासाहेबांनी मला शिकवले आहे. त्यामुळे सध्याच्या वादळात इतर पक्ष उखडून फेकले जात असताना मी शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजवेन, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला.

जागावाटपात शिवसेनेला सर्वाधिक कमी जागा मिळाल्या असल्या तरी यंदा शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील. २४ तारखेला निकाल लागल्यानंतर सत्तावाटपात जबाबदारी आणि अधिकार यांचे समसमान वाटप होईल, असेही त्यांनी सांगितले.