“यावेळीही कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यांवर बोळवण करू नका” या भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला

0
212

रायगड, दि. 24 (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली. तसेच, डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मागील अनुभवाप्रमाणे कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका. यावेळी मनापासून मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले आहे.

केशव उपाध्ये म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी दोन तासाचा का होईना दौरा काढला हे चांगलं केलं, पण मागील अनुभवाप्रमाणे कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका. यावेळी मनापासून मदत करा, आणि खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल याचीही काळजी घ्या. या संकटात विरोधीपक्ष म्हणून सोबत आहोत.”

गेल्या दोन संकटात सरकारने पूर्ण निराशा केली आहे. कोकणावर आलेले संकट खुप मोठे आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. कोकणाला गेल्या दीड वर्षांत निसर्गाने भयानक फटके दिले आहेत. आधी निसर्ग वादळाने सारे काही जमीनदोस्त केले, मग तोक्ते वादळाने पुरते उद्ध्वस्त करून टाकले, आणि त्यातून जे काही बचावले, ते महापुराने धुवून नेले. अतिवृष्टीमुळे मालमत्ता, घरेदारे होत्याची नव्हती झाली. निसर्ग वादळाच्यावेळी मदत मिळालीच नाही हे तोक्ते वादळाच्या वेळी लक्षात आले होते. तोक्तेच्या वेळची मदत अद्याप मिळालेली नाही”,असे केशव उपाध्ये म्हणाले.