Others

“यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करा”: माजी महापौर राहुल जाधव

By PCB Author

November 12, 2021

– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना मागणी

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – राज्यात शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात लागलेली आग मोठी होऊन त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या सुरक्षेबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी केली आहे.

याबाबत पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालयांचे फायर ऑडिट आणि त्यातील त्रुटी दूर करण्याबाबतचे गांभीर्य अधोरेखीत झाले आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमधील विशेषतः आयसीयूमध्ये आगीच्या घटना वांरवार घडत आहेत. याला कारण म्हणजे आगीला खतपाणी घालणारा अधिक प्रमाणात असलेला ऑक्जिन हा होय. वायसीएम रुग्णालयातील आयसीयू कक्षाची नुकतीच तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत आयसीयू कक्षात ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. यावर प्रसारमाध्यमांमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. आयसीयूमध्ये विविध उपकरणे असतात. त्यांचे तापमान कमी राहावे, तसेच रुग्णालस बाहेरील हवेची बाधा होऊ नये म्हणून वातानुकुलित यंत्रणा बसवलेली असते. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी बहुतांश जणांना कृत्रिम ऑक्जिनचा पुरवठा केला जातो. सर्व दरवाजचे व खिडक्या बंद असल्याने येथे जमा होणारा ऑक्सिजन बाहेर जाण्यासाठी जागा नसते. त्यामुळे आग लागल्यावर त्यास भडकण्यासाठी ऑक्सिजन मिळाल्यामुळे हो आग क्षणार्धात भडकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. वायसीएम रुग्णालयात चार आयसीयू कक्ष आहेत. २५ एप्रिल २०२१ रोजी वायसीएम रुग्णालतील वायू मोजणी यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये २१ टक्क्याऐजवी येथील ऑक्सिजनचे प्रमाण तब्बल २३.५ इतके आढळून आले. या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्यास जादा असलेल्या ऑक्सिजनच्या प्रमाणामुळे त्वरीत आग उग्र स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे वायसीएम रुग्णालय देखील आगीबाबत धोकायदायक स्थितीत आहे, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयाच्या आयसीयूमधील अधिक ऑक्सीजनच्या प्रमाणाचा मुद्दा समोर आला आहे. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. ऑक्सीजनची वाढलेली पातळी कमी करण्याबाबत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, असेही राहुल जाधव यांनी म्हटले आहे.