यंदा पायी दिंडी सोहळा रद्द ! वारकरी सांप्रदाय अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

0
683

पुणे, दि. २९ (पीसीबी) – आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी जाणारा पायी दिंडी सोहळा होणार यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकरी सांप्रदायातील प्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. यावेळी आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी. किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.

कोरोना संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून आषाढी वारीचं काय होणार? हा प्रश्न सर्व वारकऱ्यांना पडला होता. यावर अखेर आज निर्णय घेण्यात आला. आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरलवे जाईल. देहु आणि आळंदीहुन पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाल्याने यंदा पायी दिंडी सोहळा होणार नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची? आळंदी आणि देहुहुन पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या? याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भुमिका मांडल्या. यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भुमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली.

यंदाची आषाढी यात्रा ‘या’ पद्धतीने होण्याची शक्यता-
यापूर्वीच आषाढी वारीसाठी राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्रम्बकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका सासवड यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी दिली आहे. त्यांनी सांगितलं की, प्रस्थानाच्या दिवशी शासनाच्या नियमात राहून प्रस्थान होईल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा त्याच गावी मुक्काम राहील. पैठणमध्ये नाथच्या जुन्यावाड्यातून दिंडी समाधी मंदिरापर्यंत येईल. दशमीपर्यंत तिथेच मुक्कामी राहील. दशमीला 30 मानकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी. हा सगळा प्रवास मानाच्या पादुकांसह वेगवेगळ्या वाहनांनी करण्यात येईल.