…म्हणून ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ गाशा गुंडाळणार!

0
804

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – लक्ष्मी दुर्दैव मंगलम… भरल्या ताटावरुन कुणीतरी उठून जावे असे या मालिकेचे झाले. या मालिकेच्या निर्मात्या सौ. सारंग आणि अभिनेत्री केतकी चितळे यांच्यातला वाद फोफावला आणि त्याची थेट झळ मालिकेला बसली. ही झळ इतकी तीव्र होती की चॅनलने थेट मालिकाच गुंडाळण्याचा निर्णय घेतला. होय.. ओमप्रकाश शिंदे, सुरभी हांडे, समृद्धी केळकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ ही मालिका गाशा गुंडाळते आहे. बाबो! एका वादाचा इतका परिणाम?

येत्या २५ मे रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल. केतकीच्या व्यक्तिरेखेला टीआरपी नसल्यामुळे तिला रिप्लेस केले, असे निर्मात्या सौ. संगीता सारंग म्हणतात. तर आपल्या एपिलेप्सी या आजारामुळे पाळाव्या लागणाऱ्या पथ्यामुळेच आपल्याला सीरिअलमधून काढले असा दावा केतकी करते. खरंतर काही महिन्यांपूर्वीच या मालिकेच्या कलाकारांची नवी करारपत्र झाली होती. त्यानुसार पुढच्या वर्षापर्यंत ही मालिका चालू ठेवण्यात येणार होती. पण या वादामुळे थेट मालिकाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. आता ही मालिका जाऊन तिथे ‘लक्ष्मी नारायण’ ही मालिका येतेय.

सेटवरुन कळलेली आतली बातमी अशी की ही ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ मालिका खरंतर २० तारखेलाच संपणार होती. पण ‘लक्ष्मी नारायण’चे काम अर्धवट असल्यामुळे आणखी पाच दिवस या मालिकेला वाढवून देण्यात आले आहेत. आता २५ तारीख शेवटची ठरवली. पण, तरीही नव्या मालिकेचे अपेक्षित भाग पूर्ण होत नाहीयेत. मग ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ मालिकेला अजून काही दिवस वाढवून द्यायचा विचार चॅनल करते आहे.