‘…म्हणून राज्यकर्त्यांनी जनतेच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही’; भाजपचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल

0
231

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला अरेरावी केली होती. त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावरून जाधव यांना फटकारले आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यावर जनतेमध्ये आक्रोश असतो. याचा अर्थ जनता तुमच्या विरोधात नसते. त्यामुळे राज्यकर्त्यांनी अशावेळी जनतेच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी जाधव यांना फटकारले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यकर्त्यांनी लक्षात घ्याव, जनतेत आक्रोश असतो त्यावेळी त्यांच्या अंगावर जाणं योग्य नाही. अशा घटना घडतात त्यावेळी जनतेत आक्रोश असतो. जनता तुमच्या विरोधात नसते. त्यांच्यात आक्रोश असतो. तुमच्याशी त्यांना बोलायचं असतं. काही सांगायचं असतं. त्या अपेक्षने ते बोलत असतात. अशावेळी त्यांना चूप करणं किंवा त्यांच्या अंगावर जाणं योग्य नाही. त्यांचा आक्रोश समजून घ्यायला हवा. कालची घटना धक्कादायक होती. जाधव वरिष्ठ आमदार आहेत. मंत्री होते. त्यांचं कालचं वर्तन योग्य नव्हतं. ते याबाबत नक्कीच आत्मचिंतन करतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला. जाधव यांच्यावर कारवाई करावी की करू नये ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोकणवासीय उद्ध्वस्त झाले आहेत. गेल्या तीन वर्षातील या मोठ्या घटना आहेत. त्यामुळे सरकारने आऊट ऑफ बॉक्स जाऊन विचार केला पाहिजे. आम्ही जीआर बदलून सांगली आणि कोल्हापूरला मदत केली होती. तशीच मदत कोकणवासीयांसह इतर पूरग्रस्तांना केली पाहिजे, असं ते म्हणाले. कोकणात तातडीने मदत देणं गरजेचं आहे. कोकणवासीयांच्या घर आणि दुकानांवरील पत्रे गेले आहेत. घर स्वच्छ करायलाही पैसे नाहीत. त्याचाही सरकारने विचार केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मनसेसोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. चंद्रकांत पाटील यांना मनसेसोबत युती करण्याबाबत पत्रकारांनी विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती. मनसे आमचा शत्रू पक्ष नाही. पण त्यांचे विचार आणि भूमिका आम्हाला मान्य नसल्याचं पाटील म्हणाले होते. भाजपला भाषेच्या आधारावर होणारा भेदभाव मान्य नाही. मनसेने त्यांची भूमिका बदलायला हवी. त्यांनी अलिकडच्या काळात हिंदुत्वाद स्विकारला आहे. पण त्यांनी मूळ भूमिका बदलली असती तर विचार केला असता. पण आज युतीची कोणतीही चर्चा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.कोल्हापूर, सांगली, सातारा पाण्याखाली आल्याचं कळलं. 5 ते 6 लाख क्यूसेक्स पाणी अलमट्टीने सोडलं तर त्रास होतो. त्यामुळे सोलापूरमधून मराठवाड्याला पाणी कसं नेता येईल याबाबत जागतिक बँकेला प्रस्ताव दिला होता. याचा विचार राज्य सरकारने करावा, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी साखर कारखान्यांबाबत भूमिका स्पष्ट केली. साखर कारखाने जगले पाहिजे. ज्यांनी बुडवले त्यांना मदत द्यायची आणि बुडवणाऱ्यांना संधी का द्यायची? हे काही योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.