नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – आपण ही गोष्ट विसरु नये की, काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेसने देशाच्या विकासासाठी खूप काम केले आहे. आता काँग्रेसमध्ये आल्यानंतर मीसुद्धा काहीतरी करु शकेन, त्यामुळेच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.
शत्रुघ्न सिन्हा आज (सोमवार) एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, देशभरातून मला अनेक पक्षांकडून ऑफर्स आल्या होत्या. मला मायावती, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी यांच्या पक्षांसह महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक पक्षांकडून ऑफर्स आल्या होत्या. परंतु खूप विचार केल्यानंतर मी काँग्रेसचा हात धरला.
सिन्हा म्हणाले की, राजकारणाचे दुसरे नाव तडजोड आहे. जे काल होते ते आज नाही, जे आज आहे ते उद्या नसणार. माझे तिकीट कापण्यापूर्वी भाजपने मला एकदाही विचारण्याची तसदी घेतली नाही, त्यामुळेच मला पक्ष सोडावा लागला, असे सिन्हा म्हणाले.