…म्हणून काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीचे जमले नाही – प्रकाश आंबेडकर

0
340

शेवगाव, दि. २० (पीसीबी) – ‘केंद्रात सत्ता आल्यानंतर आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणा, अशी अट आपण काँग्रेसला घातली होती. मात्र, ही अट काँग्रेसला मान्य न झाल्याने आपण राज्यात काँग्रेसशी युती केली नाही,’ असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला. वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्ह्यातील उमेदवार सुधाकर आव्हाड यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते. आघाडीचे उत्तरेचे उमेदवार संजय सुखराम, समन्वयक प्रा. किसन चव्हाण, प्रकाश भोसले, अशोक सोनवणे, अरुण जाधव, तुकाराम पवार, मछिंद्र पवार, भोरू म्हस्के आदी या वेळी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘काँग्रेसशी युती करण्याची आपली तयारी होती; मात्र, आपण आरएसएस ला संविधानाच्या चौकटीत आणावे लागेल, अशी पहिली अट घातली होती. काँग्रेसने ही अट मान्य केली असती तर आरएसएसच्या वाघाची नखे निघाली असती व त्याला दातसुद्धा राहिले नसते व हा वाघ खेळण्यातील वाघ राहीला असता; मात्र, दरवेळेस आरएसएस ची भीती दाखवून मिळणारी मुस्लिमांची मते आपल्याला मिळणार नाहीत, या भीतीने काँग्रेसने तसे करण्यास नकार दिल्याने आपण बहुजन विकास आघाडीला स्वत्रंतपणे रिंगणात उतरवले आहे. मी अकलमंद असल्याने हा निर्णय घेतला आहे. मुस्लिमांनी आता विचारपूर्वक मतदान करायला हवे. उद्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी काही खासदारांची गरज लागली तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपला देतील. २००४ मध्ये गोध्रा हत्याकांड झाले त्या वेळी शरद पवार हे देशाचे कृषिमंत्री होते. मग त्यांनी त्या वेळी मोदींवर केस का ठोकली नाही. निवडणूक आली की मशिदीत अजान देणारा मौलाना एनसीपीला मते द्या, असे सांगेल; मात्र, ही मते भाजपला जाणार आहेत, याचे भान मुस्लिमांनी ठेवावे. मुस्लिमांनी मते दिली किंवा नाही दिली तरीही या ठिकाणची जागा आम्ही जिंकणारच आहोत. मेरी पैदाशीही काँग्रेस की सेवा करनेके लिए है, असे मुस्लिम म्हणतो; मात्र, या सभेला पैसे न देताही जी गर्दी जमा झाली आहे, ती गर्दी आरएसएस व भाजपशी लढणाऱ्या माणसांची गर्दी आहे. या गर्दीला आता मुस्लिमांनी पाठिंबा द्यायला हवा,’ असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

तुमचा वापर हत्यारासारखा होत आहे ते ओळखा. काँग्रेस जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत आरएसएसचा वाघ ते पिंजऱ्यात बंद करणार नाहीत. स्व. गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र होते. भाजपमध्ये राहून त्यांनी ओबीसींचे नेतृत्व केले होते; मात्र, ओबीसींचे राजकारण संपवण्यासाठी त्यांना संपवण्यात आले,’ असा आरोप आंबेडकर यांनी केला. या गोष्टींचा छडा वंजारी समाजाने लावायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘भाजप सध्या ब्लॅकमेलिंगचे राजकारण करत आहे. बीडच्या निवडणुकीत आम्हाला संविधान बदलायचे आहे, असे आमच्या भगिनी म्हणाल्या; मात्र, त्यांना हे भाजपने म्हणायला लावले आहे. त्या अशा कधीही बोलू शकत नाहीत. संविधान नसते तर आमच्या भगिनी मंत्री झाल्या नसत्या व गोपीनाथ मुंडेसुद्धा उपमुख्यमंत्री झाले नसते. मराठा समाजात आज अनेकांना डावलून कुटुंबशाहीचे राजकारण सुरू झाले आहे. ही कुटुंबशाही संपल्याशिवाय डावलले गेलेल्या मराठा समाजातील तरुणांची दारे उघडणार नसल्याने आता तरुणांनी सावध व्हायला हवे. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीत माझे आठ नातेवाईक उभे आहेत. या कुटुंबशाहीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. नगर दक्षिणमध्ये अनेक इच्छुक होते; मात्र, तरीही विद्यमान आमदाराला संधी देण्यात आली ही मॅच फिक्सिंग आहे. मराठा समाजसुद्धा वंचित आहे व आम्हीसुद्धा वंचित आहोत. काँग्रेसचीसुद्धा आता भाजप झाली असून राष्ट्रवादी तर भाजपच्या मांडीवर जाऊन बसली आहे. दबावाचे राजकारण संपवण्यासाठी आमच्या आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या,’ असे आवाहन त्यांनी केले.