मोदी सरकारपेक्षा देवेंद्र फडणवीस सरकारचे काम चांगले – अण्णा हजारे

0
637

पुणे, दि. ११ (पीसीबी) – केंद्रातील मोदी सरकारपेक्षा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे काम चांगले आहे. राज्य सरकारने दखल घेत लोकायुक्त कायदा करण्यासाठी १० जणांची समिती नेमली आहे, असे सांगून ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे.

पुण्यातील यशदा येथे नवीन लोकायुक्त कायदा बनवण्यासंदर्भात अण्णा हजारे यांची राज्याचे मुख्य सचिव यांच्या समवेत बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीआधी अण्णा हजारे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मी जनतेच्या हक्कांसाठी मोदी सरकारकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून न्याय मागितला. मात्र माझ्या पत्रव्यवहाराची मोदी सरकारने दखल घेतली नाही.  तरीही आपण आपले काम करत रहायचे, ही माझी पद्धत आहे, असेही अण्णा हजारेंनी म्हटले आहे.

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे. मात्र, त्यांच्याकडून चुका झाल्या, तर आपण त्यांनाही सुनावू, असेही हजारे  म्हणाले.  केंद्र सरकारकडून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी झाली. पण त्यानंतर लोकायुक्त कायद्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाही. यासाठी आंदोलनाचा इशारा देताच राज्य सरकारने लोकायुक्त कायद्यासाठी समिती नेमून कामाला सुरुवात  केली आहे, असे हजारे म्हणाले.