इचलकरंजी, दि. १७ (पीसीबी) – विकासाचा कोणताच मुद्दा उरला नसल्याने शहीद जवानांच्या नावावर भाजप मते मागत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देशाला कलंक आहेत. हुकूमशाही पद्धतीने देश चालविण्याचा त्यांचा डाव असून, लोकशाही संपविण्याची भाषा करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे,’ असे आवाहन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकदा फसलात, पुन्हा फसू नका, असा सल्लाही दिला. यावेळी राज ठाकरे यांनी स्वच्छ भारत मोहिमेवरूनही मोदी सरकारवर हल्ला चढवला. स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत एका आठवड्यात ८ लाख ५० हजार शौचालये बांधली, असा दावा मोदींनी बिहारमध्ये केला होता. एका आठवड्यात ८ लाख ५० हजार शौचालये म्हणजे एका मिनिटात ८४ शौचालये आणि ५ सेकंदात ७ शौचालये बांधली जातील. हा विक्रमच म्हणायला हवा. इतक्या वेळात होत पण नाही, तितक्या वेळात यांनी शौचालये बांधली, असा टोला राज यांनी लगावला.