“मोदी यांच्या मागे ठामपणे उभी राहिले, पण कोरोना झाला तेव्हा कोणी नाही आले”

0
361

वाराणसी, दि. ४ (पीसीबी) : उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे ऑक्सिजन, औषधे आणि उपचारांअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ही वेळ फक्त सामान्य लोकांवरच नव्हे तर पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी असलेल्या पं. छन्नूलाल मिश्रा यांच्यावरही ओढावली आहे.

पं. छन्नूलाल मिश्रा यांच्या मुलीचा नुकताच एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर छन्नुलाल मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी संबंधित रुग्णालयावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच पं. छन्नूलाल मिश्रा यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यांची मोठी मुलगी संगीता मिश्रा हिलादेखील कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. त्यानंतर पं. छन्नूलाल मिश्रा यांनी मुलगी नम्रता हिने रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयाने आमच्याकडून केवळ पैसे उकळले. त्यानंतर अचानक माझ्या बहिणीचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले. आम्ही तिच्यावर उपचार सुरु असतानाचे सीसीटीव्ह फुटेज मागितले तर ते देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे माझ्या बहिणीची हत्या झाली आहे, असा आरोप नम्रता यांनी केला. या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन डॉक्टरांची एक समिती स्थापन केली आहे. तर नम्रता मिश्रा यांनी संबंधित रुग्णालयाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

कोण आहेत पं. छन्नूलाल मिश्रा ?
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तेव्हा पं. छन्नूलाल मिश्रा यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. मात्र, आता याच पं. छन्नूलाल मिश्रांचा भाजपला पुरता विसर पडलेला दिसत आहे. नम्रता यांच्या माहितीनुसार, त्यांच्या बहिणीला उलटी आणि ताप येत असल्यामुळे 24 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काही दिवसांच्या उपचारानंतर मिश्रा कुटुंबीयांना दीड लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर अचानक संगीता मिश्रा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. नंतरच्या काळात संगीता मिश्रा यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. त्यांना सात्विक भोजन आणि काढा दिला जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मात्र, 1 मे रोजी अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मृत्यूचे कारण विचारले असता प्रत्येक डॉक्टरांकडून वेगवेगळी माहिती देण्यात आली. त्यामुळे मिश्रा कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता.