Maharashtra

मोदी यांच्या भाषणावर टीका करणारे एकनाथ खडसे यांचे रिट्वीट खूपच बोलके

By PCB Author

October 21, 2020

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे संकेत त्यांच्या ट्वीटमधून मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं एक ट्वीट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. तेच ट्वीट एकनाथ खडसे यांनी रिट्वीट केलं आहे. खडसे यांची ही कृती सूचक मानली जात आहे.

जळगाव जिल्ह्यात लागलेल्या खडसेंच्या पोस्टरमधून भाजपचं कमळही गायब आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगत आहे. पण भाजप सोडून खडसे कुठेही जाणार नाहीत, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ट्विटरवरुन दिलेले संकेत महत्त्वाचे आहेत.

आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!#ModiMessageToNation

— Jayant Patil (@Jayant_R_Patil) October 20, 2020

 

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरासाठी 17 ऑक्टोबरचा मुहूर्त मानला जात होता. मात्र हा मुहूर्त टळल्यानंतर आता 22 तारखेचा मुहूर्त असल्याच्या चर्चा पुन्हा जोर धरु लागल्या आहेत. स्वतः एकनाथ खडसे यांनी मात्र या सर्व विषयावर मौन बाळगले आहे. कोणताही निर्णय झाल्यास तो आपण स्वतः कळवू असं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

खडसेंच्या पोस्टरमधून कमळ गायब दरम्यान एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेनंतर कार्यकर्त्यांनी जळगावात पोस्टर लावले. कार्यकर्त्यांनी भाजपचं चिन्ह हटवत खडसे यांचे बॅनर आपल्या वाहनावर आणि रस्त्याच्या कडेला लावले आहेत. “भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण,” “भाऊ आम्ही सदैव आपल्यासोबत” असं बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे समर्थकांची बॅनरबाजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. भाजपमध्ये आपल्याला सातत्याने डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत. एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. मात्र, पक्षाच्या नेत्यांकडून कुठल्याही पद्धतीने विचारणा केली नाही किंवा कारवाई देखील केली नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं चर्चा आहे.