Desh

मोदी म्हणतात, गेल्या पाच वर्षात आपण भ्रष्टाचाराला नष्ट केलं – लोकहो तुम्ही किती सहमत आहात, मोजक्या शब्दांत व्यक्त व्हा…

By PCB Author

May 30, 2020

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) : पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सत्रातील कार्यकाळाला आज (30 मे) एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने मोदी यांनी जनतेला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी विविध कामांची आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. यामध्ये सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, कलम 370 आणि तीन तलाक यांचा उल्लेख केला आहे. याशिवाय स्थलांतरित मजुरांचे होणारे हाल यावरदेखील त्यांनी पत्रात भाष्य केलं आहे. स्थलांतरित मजुरांसाठी सरकारककडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नाविषयी देखील त्यांनी पत्रात लिहिलं आहे. गेल्या पाच वर्षात आपण भ्रष्टाचाराला नष्ट केलं, असा दावा पंतप्रधानांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी पत्रात म्हणतात… माझ्या प्रिय भारतीय मित्रांनो, एका वर्षापूर्वी इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. देशातील 130 कोटी जनतेने पुन्हा एकदा बहुमताने मोदी सरकारवर जाबाबदारी सोपवली. मी देशाच्या 130 कोटी नागरिकांना आणि लोकशाहीप्रधान विचारांना वंदन करतो. देशात कोरोनाचं संकट नसतं, सर्वसामान्य परिस्थिती असती तर आज मला आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य लाभलं असतं. मात्र, कोरोनाच्या या जागतिक महामारीच्या संकंटात मी पत्रामार्फतच आपल्याशी संवाद साधून आशीर्वाद घेऊ इच्छितो.

आपण लोकशाहीचं ज्याप्रकारे सामूहिक दर्शन घडवलं आहे ते जगभरासाठी एक मार्गदर्शक आहे. गेल्या पाच वर्षात आपण भ्रष्टाचाराला नष्ट केलं. गेल्या पाच वर्षात लाखो गरिबांना मदत करता आली. गरिबांसाठी मोफत गॅस आणि वीज देण्यात आली. भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं. याशिवय OROP, वन नेशन वन टॅक्स, जीएसटी सारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरु करण्यात आल्या. काही विषयांवर व्यापक चर्चा झाली. कलम 370 च्या निर्णयाने राष्ट्रीय एकता आणि एकीकरणाची भावनेला चालना दिली. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेला राम मंदिराच्या खटल्यावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक सौहार्दपूर्ण निर्णय घेतला. तीन तलाक सारख्या प्रथेला बंद केलं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त अनेक चांगले निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे भारताच्या विकासाला आणखी गती मिळाली.

संरक्षण कर्मचाऱ्यांच्या प्रमुख पदाचा मुद्दादेखील प्रलंबित होता. देशाच्या तीन सशस्त्र दलांमध्ये समन्वय व्हावा, त्यासाठीदेखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सरकारची गरिब, शेतकरी, महिला आणि युवकांना सशक्त बनवणं, हीच प्राथमिकता आहे. पीएम किसान सम्मान निधीचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होत आहे. या योजनेअंतर्गत एका वर्षात 9 कोटी 50 लाख पेक्षाही जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 72 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 15 कोटींपेक्षा अधिक घरांमध्ये पाईप कनेक्शनद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आपल्या देशात पहिल्यांदाच असंगठित क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार आणि श्रमिकांना 60 वर्ष वयानंतर 3 हजार रुपये मासिक पेंशन देण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे. याशिवाय मच्छिमारांसाठी देखील अनेक योजना लागू केल्या आहेत. त्याचबरोबर व्यापाऱ्यांसाठीदेखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. आपण वेगाने पुढे जात होतो. मात्र, कोरोनाच्या संकंटाने भारताला घेरलं. कित्येक लोकांनी अंदाज वर्तवलेला की, कोरोना जेव्हा भारतावर हल्ला करेल तेव्हा भारत संपूर्ण जगासाठी संकंट बनेल. मात्र, आज आपण जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.