मोदी भ्रष्टाचारी, अनिल अंबानींचे चौकीदार; राहुल गांधींचा घणाघात  

0
436

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – राफेल करारप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही  पंतप्रधान मोदी गप्प आहेत. ते भ्रष्टाचारी असून अनिल अंबानींचे चौकीदार आहेत.  त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले, असा आरोप करून मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

दिल्लीत आज ( गुरुवारी) राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की, मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अनिल अंबानींचे पंतप्रधान आहेत. कराराच्या १० दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. अनिल अंबानींवर हजारो कोटी रुपयांचे कर्ज असून अशा व्यक्तीच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीच झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मोदी भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला  त्यांनी थेट मोदींनाच भ्रष्टाचारी ठरवले आहे. तर राफेल करारावरुन वादळ उठले असतानाच देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण फ्रान्समध्ये पोहोचल्या आहेत. संरक्षणमंत्र्यांना तिथे जाण्याची इतकी घाई का होती? असा सवालही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला.