मुंबई, दि. १४ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी आमचे वस्ताद अन् आम्ही त्यांचे चेले आहोत. मैदान कसं मारायचं हे आम्हाला चांगलंच माहित आहे, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. एका मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे, खरी पण समोर पैलवानच दिसत नाही, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यावर मी पैलवान संघटनेचा अध्यक्ष आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जरा माहिती घेऊन बोलावे. जर समोर पैलवान नसते तर देशाच्या पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेण्याची वेळ आली नसती, असे प्रत्युत्तर पवार यांनी दिले होते. तसेच कुस्ती पैलवानमध्ये होत असते, तुम्ही कसले पैलवान, असे हातवारे करत पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता.
यावर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला असले संस्कार झालेले नाहीत. नटरंग सारखे आम्हाला करता येत नाही, असे उत्तर दिले होते. दरम्यान, राज्यात कलम ३७० चा प्रचार करणे योग्य आहे का? या प्रश्नावर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर तो मुद्दा प्रचाराचा काय असू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.